

नारायणगाव: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड 24 मार्च रोजी होणार आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा सत्यशील शेरकर यांची निवड होणार हे निश्चित आहे.उपाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार या बाबतची उत्सुकता वाढली आहे. शेरकर ठरवतील त्याच व्यक्तीच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडणार हे निश्चित. उपाध्यक्षपद तालुक्याच्या बाहेर जाणार की तालुक्यात राहणार या बाबतचे वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.
विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली,यामध्ये 17 जागा सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलच्या बिनविरोध झाल्या होत्या तर चार जागांवर मतदान झाले. या ठिकाणी सुद्धा सत्यशील शेरकर यांनीच बाजी मारली. शेरकर यांचा विघ्नहर कारखान्यामध्ये कारभार चांगला असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला आहे.
नुकत्याच निवडून आलेल्या संचालक मंडळांमधून कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड सोमवारी (दि. 24) करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
अशोक घोलप यांनाच पुन्हा शेरकर उपाध्यक्ष पदाची संधी देतात की दुसऱ्या तरुण चेहऱ्याला उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवतात या बाबत सुद्धा वेगवेगळे तर्क बांधले जात आहेत. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तू आबा काळे यांचे नातू यशराज काळे यांना कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे .