

अशोक मोराळे
पुणे : महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या आठ विषारी दारुकांडांमध्ये तब्बल 451 जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन 1968 ते 2026 या 58 वर्षांच्या कालावधीत हे मृत्युतांडव घडले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फ्रेंच पॉलिश आणि मिथेनॉलमिश्रित गावठी दारू प्यायल्याने हे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, सर्वाधिक मृत्यू हे मिथेनॉलमिश्रित दारू प्राशन केल्याने झाल्याचे दिसून येते. तथापि, देशातील अकरा घटनांमध्ये 1,498 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 2016 मध्ये अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील पांगरमल गावात मिथेनॉलमिश्रित दारूच्या सेवनाने नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मे 2026 मध्ये दहा वर्षांच्या कालावधीनंतर पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरातील पांढरेमळा, ससाणेनगर, उरुळी कांचन येथे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड येथील 17 जण, पुणे शहरातील 09 जणांचा समावेश आहे. पुणे शहराबाबत बोलायचे झाले तर पोलिसांच्या नोंदीनुसार चौघांचाच मृत्यू या दारूने झाल्याचे सांगितले जाते. तर, इतर पाच जणांचा देखील मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे हा आकडा 26 आहे. मात्र, सीआयडीच्या रॅकॉर्डवर पिंपरी-चिंचवड येथील अकरा आणि पुण्यातील चार अशा एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
विषारी दारूसाठा म्हणजे मृत्यूचा बॉम्ब
देशात चार दशकांत प्रमुख विषारी दारू दुर्घटनांमध्ये किमान १ हजार ४९८ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एका रात्रीत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. स्वस्त दारूच्या मोहापायी घेतलेला एक घोट मृत्यूचे कारण ठरला. या दुर्घटना केवळ आकडेवारी नसून हजारो विधवा, अनाथ मुले आणि उद्ध्वस्त संसारांची वेदनादायी कहाणी आहेत. विषारी दारूचा प्रत्येक साठा हा समाजासाठी फिरता मृत्यूचा बॉम्ब असल्याचे या घटनांमधून निदर्शनास येते.
देशातील प्रमुख विषारी दारू दुर्घटना
1982 मध्ये कोची (केरळ) मध्ये 77 जणांचा मृत्यू .
नोव्हेंबर 1991 मध्ये दिल्लीत 199 जणांचा मृत्यू.
मे 1992 मध्ये कटक ओडिशात 200 हून अधिक मृत्यू, 600 जण रुग्णालयात दाखल.
2008 मध्ये तामिळनाडूत मिथेनॉलमिश्रित दारूने 180 मृत्यू.
013 मध्ये उत्तर प्रदेश आझमगढ येथे 39 मृत्यू.
2012 ते 2014 दरम्यान गुजरातमध्ये 177 मृत्यू.
जुलै 2014 मध्ये कर्नाटकमध्ये 345 जणांचा मृत्यू.
ऑगस्ट 2016 मध्ये गोपालगंज बिहारमध्ये 16 मृत्यू.
डिसेंबर 2018 मध्ये पश्चिम बंगाल संग्रामपूरमध्ये 143 मृत्यू.
ऑगस्ट 2020 मध्ये पंजाबमध्ये विषारी दारुमुळे112 जणांचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशातही ऑगस्ट 2020 मध्ये हँड सॅनिटायझरचे सेवन केल्याने 10 जणांचा मृत्यू.