

बारामती: बीडमधील संवेदनशील प्रकरणांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची केवळ बीड जिल्ह्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अपरिमित हानी होवू शकते, असे मत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीचा जोर वाढत असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी बारामतीत केलेल्या या विधानामुळे आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे. धस हे शनिवारी (दि. १) फलटण दौऱ्यावर जात असताना बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य करताना म्हटले होते की, माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. हा दाखला देत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना नेमके काय म्हणायचे आहे. हे समजून घ्यावे असेही धस यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, अजित पवारांच्या भोवती जो कोंडावळा आहे. तो त्यांना योग्य सल्ला देण्याऐवजी अयोग्य सल्ला देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी या प्रकरणामुळे होणार आहे.
बीडमध्ये दिवसाढवळ्या माणसे मारल्यानंतर बीडकडे सर्वांचे लक्ष लागणारच. बीडमध्ये सर्वत्रच असमतोलता निर्माण करून ठेवली आहे. आम्ही वारंवार सांगत आहोत की, बिंदू नामावली प्रमाणे कर्मचारी आणा. या ठिकाणी दोन टक्के कर्मचाऱ्यांच्या जागेवर थेट सातशे कर्मचारी झाल्यावर कसे होणार ? असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थित केला.