पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांची दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. शहराला आवश्यक असणारे चौपदरीकरण, लोकल फेर्यांची वाढ, एक्स्प्रेस थांब्याची मागणी आणि एकूण नव्याने कोणत्याच योजना नाहीत. गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेल्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहराची लोेकसंख्या जवळपास 27 लाखांच्या घरात आहे. शहरात आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाबरोबरच 650 मोठे उद्योग समूह आहेत. पश्चिम बंगाल, कोलकत्ता, कर्नाटक यांसह राज्यातील अनेक शहरांतून 8 लाख नागरिक नोकरी व्यवसायनिमित्त शहरात ये-जा करतात.
दरररोज 150 हून अधिक एक्सप्रेस, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. राज्य सरकारने पुणे-लोणावळा 63 किलोमीटरवर तिसर्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी 4 हजार 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळातील काही टप्प्यात विकास होण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी कोणतेच प्रयत्न केल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येत नाही.
तळेगाव ते पिंपरी असा गेल्या अनेक वर्षापासून प्रवास करतोय. सकाळी विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकदारावर्गामुळे रेल्वेत गर्दी असते. त्या वेळेत एकादी तरी फेरी वाढविणे गरजेचे आहे. चौपदरीकर नसल्याने लोकल अनेकदा स्टेशनवर थांबून ठेवली जाते.
– संदीप पवार, स्थानिक नागरिक, तळेगाव
पुणे-लोणावळा लोकल वाढीसाठी 1989 पासून प्रयत्न करीत आहोत. रेल्वे अधिकार्यांना अनेकदा भेटूनही निधी उपलब्ध नसल्याचे सांगतात. 35 वर्षांपासून रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, केवळ दुर्लक्ष केले जात आहे. आतापर्यंत केवळ आश्वासन मिळाले. – गुलाम अली भालदार, चिंचवड प्रवासी संघ
अंदाजपत्रकात चारशे वंदे मातरम रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, त्याचा फायदा पुण्यासह पिंपरी-चिंचवडकरांना कितपत होणार हे महत्वाचे आहे. एक्सप्रेसला शहराला एखादा थांबा मिळावा, ही अनेक वर्षांपासून मागणी आहे.
– इक्बाल मुलाणी,पिंपरी-चिंचवड रेल्व प्रवासी संघ