विदर्भ ते सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारे अनेक मार्ग असताना आता शक्तिपीठ महामार्ग कोणासाठी बांधला जात आहे? या महामार्गातून कोणाला 'शक्ती' मिळणार आहे? पैसे नसताना असे महामार्ग बांधण्याच्या घोषणा कशाला करता? असे सवाल करत विधान परिषदेत विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी वेलमध्ये धाव घेत 'कमिशन खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,' 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा' अशी जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळात सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
आ. सतेज पाटील यांचा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारवर तुफान हल्ला चढवला. या नव्या महामार्गाची गरज का भासली? कोणी मागणी केली नसतानाही हा महामार्ग बांधण्याचा घाट का घातला जात आहे? जर कोणी मागणी केली असल्यास त्यांचे निवेदन सभागृहात सादर करा, अशी मागणी करतानाच कंत्राटदारांचे भले करण्यासाठी, त्यांच्या हितासाठी हा महामार्ग बांधला जात आहे का? नव्या महामार्गातला 'हुजूर' कोण आहे, असे सवाल उपस्थित करत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,
लोकांची मागणी नसताना केवळ कंत्राटदारांसाठी अशा योजना आणल्या जातात. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करा. भाई जगताप काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी किती लोकांच्या भावनांचा विचार केला. आतापर्यंतच्या महामार्गासाठी, नव्या प्रकल्पांसाठी जमिनी देऊन शेतकरी अल्पभूधारक झाला आहे, तो रस्त्यावर येईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा तो 'हुजूर' कोण आहे. लोकभावना लक्षात घेऊन सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणीही जगताप यांनी यावेळी केली.
भुसे विरोधकांच्या मागणीवर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे म्हणाले, स्थानिक शेतकरी, स्थानिक मंडळी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून प्रकल्पाबाबत मार्गक्रमण केले जाईल. कोणावरही दडपशाही न करता सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तसे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत, असे भुसे यांनी सांगितले.
• विधान परिषदेत विरोधकांची जोरदार मागणी
• वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी
• गोंधळात सभागृहाचे कामकाज तहकूब