राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : शेतातील आणि व्यापार्यांच्या गोदामातील सोयाबीन चोरी करून चैनीसाठी लाखो रुपये कमावणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेत अनेक शेतकर्यांना ऐन दिवाळीत आर्थिक अडचणीत आणणार्या अशा टोळीतील चार युवकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोयाबीन, पिकअप आणि चोरलेले पिकअप गाडीचे 3 नवे कोरे टायर असा 6 लाख 99 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चोरी करणारे सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत. चैन करण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वजण 18 ते 24 वयोगटातील असून, समीर आहेरकर (रा. आरूडेवाडी, मूळ रा. अहिरे), अविनाश राक्षे (रा. वरची भांबुरवाडी), ऋतिक तांबे (रा. चाकण, मूळ रा. तिन्हेवाडी) आणि प्रफुल्ल धंद्रे (रा. गढई मैदान, मूळ रा. घोटवडी, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना शनिवारी (दि. 18) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दि. 29 ऑक्टोबर रोजी तिन्हेवाडी रस्त्यावर असलेल्या सोयाबीन गोदामातून चोरी झाली होती. गोदामाचे कुलूप तोडून सोयाबीनचे कट्टे चोरीला गेले होते. त्याची तक्रार पोलिसांत दाखल होती. याशिवाय शेतकर्यांच्या शेतातील तसेच घर, पडवीत रचून ठेवलेले सोयाबीन चोरी होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. दिवाळीत त्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पोलिस पथक तयार करून पाळत ठेवली होती. त्याद्वारे ही टोळी सक्रिय स्थितीत पोलिसांच्या ताब्यात आली.
हेही वाचा