पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की, विविध विषयांचे पेपर व्हायरल होणे किंवा पेपर फुटणे, हे प्रकार ठरलेलेच असतात. परंतु, यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेला या प्रकारांचा फटका बसला नाही. मंगळवारी (दि. 19) बारावीचा शेवटचा पेपर आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कॉपी केसेस वगळता अन्य गैरप्रकारांना चाप लावण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान घेण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या. यामध्ये राज्यमंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले.