पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुस्तके समाजाबद्दलच्या भावना निर्माण करत असतात. आपल्या राष्ट्राच्या खजिन्यात संपत्तीपेक्षा विचारांचा खजिना किती हेदेखील पाहणे महत्त्वाचे असते. यासाठी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन होणे आवश्यक असून, समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्मितीत या महोत्सवांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 22) भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, राहुल कुल, श्रीकांत भारतीय, युवराज मलिक, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रा. संजीव सोनवणे, आयुक्त विक्रम कुमार, विनयकुमार चौबे, विकास ढाकणे, संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ज्ञान कधी नष्ट होणारे नसते. जेव्हा आपण पुढच्या पिढ्यांना ज्ञान देणे बंद करतो तेव्हाच ज्ञान संपते. हल्ली तरुणाईचा स्क्रीन टाइम वाढल्याचा प्रकार समोर आला असताना पुस्तक महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद अभिनंदनीय आहे.
राजकीय नेते वाचत नाहीत हा चुकीचा समज आहे. मात्र पुस्तकांपेक्षा माणसे जास्त व्यामिश्र आहेत. त्यामुळे पुस्तकांपेक्षा माणसे वाचायला जास्त आवडतात, असा सूर राजकीय नेत्यांच्या चर्चेत व्यक्त झाला. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात 'माझे वाचन माझा अनुभव' या विषयावरील चर्चेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भांडारी, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी सहभाग घेतला. वसुंधरा काशीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, की वृत्तपत्रांपासून वाचनाची सुरुवात झाली. पंढरपूरला आजोळी खूप पुस्तके होती. जे मिळेल ते वाचायला आवडते.
शिदोरे म्हणाले, की मुख्याध्यापकाचा मुलगा असल्याने महाविद्यालय कायम खुले होते. तिथून वाचन सुरू झाले. घरातही वाचनाचे उत्तम वातावरण होते. सॉल्व्हिंग टफ प्रॉब्लेम्स या पुस्तकाच्या वाचनाने मी राजकारणाकडे आकृष्ट झालो. इंग्रजी भाषेतील साहित्य मराठीत येण्यात मर्यादा आहेत. आर्ट ऑफ वॉर या मूळ चायनीज पुस्तक, अल्केमिस्ट अशा काही पुस्तकांनी प्रभावीत केले. भांडारी म्हणाले, की वडील संस्कृतचे विद्वान, शिक्षक असल्याने घरात खूप पुस्तके होती. लहानपणापासून पुस्तकांशी संबंध आला. बालपणापासूनच सुरू झालेले वाचन आजतायगत सुरू आहे. जुन्या पुस्तकांचे संकलन करायला आवडते.
हेही वाचा