![चीनच्या शिरजोरीला पं. नेहरू जबाबदार : परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Fjay.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान पं.नेहरू यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाची भारताला खूप मोठी किंमत मोजावी लागली. प्रामुख्याने चीन हा देश अधिक मुजोर अन् शिरजोर बनला. मात्र, मोदी सरकारने ही नीती पूर्ण बदलली अन् चीनच्या कुरघोड्यांना चोख प्रत्युत्तर दिले, अशी टीका देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी येथे केली. पुणे शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात युवा स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने 'व्हाय भारत मॅटर्स' या विषयावर जयशंकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
ही मुलाखत भाजपच्या परराष्ट्र प्रचार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी घेतली. या वेळी तरुण विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची तोबा गर्दी होती, बालगंधर्व सभागृह कमी पडले. त्यामुळे चारही बाजूंना पडद्यावर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा.मेधा कुलकर्णी,आ. माधुरी मिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयशंकर म्हणाले, रशियाकडून तेल घेऊन नका, असा दबाव भारतावर होता. मात्र, आपण तो जुमानला नाही. तो जुमानला असता, तर भारतात महागाई वाढली असती. या युद्धावर एकच तोडगा आहे, तो म्हणजे रशिया-युक्रेनची सकारात्मक चर्चा यात भारत मध्यस्थी करायला तयार आहे. पण युक्रेन रशियाला त्यात बोलवायला तयार नाही.
ते म्हणाले, 1962 ते 2014 पर्यंत सीमा सुरक्षेचे नीट धोरण आपल्या देशात नव्हते. त्याचे बजेट अवघे 3 हजार कोटी होते. ते मोदी सरकारने 14 हजार पाचशे कोटी रुपयांवर नेले. त्यामुळे कोविड काळात चीनने जी घुसखोरी केली त्याला चोख प्रत्युत्तर देता आले.
परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांची टीका
तरुणांना प्रश्नोत्तर रूपाने समजावून सांगितले कूटनीतीचे महत्त्व
जयशंकर म्हणाले,चीनच्या कुरापती आपल्याला लवकर कळत नव्हत्या, कळल्या तरी त्या फार गांभीर्याने पंडित नेहरू घेत नसत. त्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी त्यांना खूप मोठे पत्र लिहून चीनबद्दल अतिविश्वास घातक ठरेल, असे सांगितले. मात्र, तो देश आपला शेजारी आहे. तुम्ही चीनबाबत जास्तच शंका घेत आहात, असे नेहरूंचे उत्तर होते. पुढे 1962 मध्ये चीनने हल्ला केला तेव्हा तो देश काय आहे हे आपल्याला समजले.
रामायणात श्रीहनुमानाने जी भूमिका निभावली ती राजदूताची होती. त्याने आधी लंकेत जाऊन तेथील सर्व वातावरण अशांत केले. नंतर स्वतःला अटक करवून घेत रावणासमोर न घाबरत वापरत भूमिका मांंडली. ही योग्य कूटनीती होती. त्यामुळे हनुमान हे आपल्या देशातील पहिले राजदूत ठरले. प्रभू श्रीरामाला वारंवार विघ्न आली. राक्षसांकडून वारंवार हल्ले होत, पण त्यांनी कूटनीतीचा वापर करीत त्यावर मात केली,असेही जयशंकर यांनी सांगितले.
हेही वाचा