

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या उमेदवारांनी स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांसाठी अर्ज केला होता, ते आता पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांना 1 जूनपासून सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करता येणार असल्याचे सीबीएसईच्या वतीने स्पष्ट केले आहे.
उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी, सीबीएसईने सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून प्रश्नपत्रिकेची गुणदान योजना डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. यानंतर, सर्व विद्यार्थी गुणदान योजनेचा वापर करून आपल्या उत्तरपत्रिका तपासू शकतील. जर एखाद्या प्रश्नाला गुण दिले गेले नसतील किंवा एखादा प्रश्न अपूर्ण सोडला असेल, तर अर्ज करताना विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे पुनर्मूल्यांकन का करावे, याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी असा करा अर्ज
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई अधिकृत संकेतस्थळ ललीश.र्सेीं.ळप ला भेट द्यावी. वेबसाइटच्या होमपेजवर, विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन 2026 या लिंकवर क्लिक करावे. त्यांनतर विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्यासाठी आपला रोल नंबर आणि प्रवेशपत्र आयडी टाकावा. आता विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रकार निवडावा. यानंतर आवश्यक शुल्क भरून अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून घ्यावी.
प्रत्येक प्रश्नासाठी 25 रुपये भरावे लागतील
प्रत्येक प्रकारच्या पुनर्मूल्यांकन अर्जासाठी स्वतंत्र अर्ज शुल्क निश्चित केले आहे. गुणांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी 100 रुपये जमा करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जर विद्यार्थ्याला आपली उत्तरे तपासून घ्यायची असतील, तर त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी 25 रुपये भरावे लागतील.