पुणे-नगर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त दगड, खडी, मुरूम भरून अवजड वाहने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट धावत आहेत. या वाहनांवर वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील काही महिन्यांत अवजड वाहनांच्या धडकेत नगर महामार्गावर वाघोली येथे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
परिवहन विभागासह वाहतूक व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरात क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन जाणार्या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांसाठी पुणे-नगर रोडसह इतर रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहतूक करण्यास मनाई असतानासुद्धा अवजड वाहने नियमांचे उल्लंघन करत धावताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवजड वाहनांची जीवघेणी स्पर्धा वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतांश वाहने राजकीय नेते, कार्यकर्त्यांची असल्याने परिवहन, महसूल व वाहतूक विभागांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक, कर्कश हॉर्न वाजवणे, भरधाव वेगाने धोकादायकरीत्या वाहने चालवण्याच्या स्पर्धेमुळे परिसरातील अनेक निष्पाप लोकांना गेल्या काळात जीव गमवावा लागला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालक, मालकांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे त्यांना कोणाचीही भीती उरली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांची तक्रार करायची असल्यास वाहतूक, महसूल विभागांच्या अधिकार्यांशी सहज संपर्क करता येतो. परंतु, परिवहन विभागाचे अधिकारी दर दहा दिवसाला कार्यक्षेत्र बदलत असल्याने सर्वसामान्यांचा या विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क होऊ शकत नाही. प्रशाससनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, मालकांवर तातडीने कारवाई करावी.
राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली