सोनकसवाडी-पणदरे गावास जोडणारा निरा डाव्या कालव्यावरील ब्रिटिशकालीन पूल केव्हाही कोसळेल अशी अवस्था असून, पूल शेवटची घटका मोजत आहे. एखाद्यी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दगडी बांधकामातील हा पूल धोकादायक बनला आहे. पूल आतून आणि बाहेरून खचला आहे. संरक्षक कठडे तुटलेले आहेत. या पुलावरून वाहनांची सातत्याने वर्दळ असते. त्याचबरोबर शेतकर्यांच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर अशा वाहनचालकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनाही आपला जीव मुठीत घेऊन ये-जा करण्याची वेळ आली आहे. पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे.
तरीसुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. पुलाच्या कामास मंजुरी असून, लवकरच काम केले जाणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले जात आहे; मात्र प्रत्यक्षात काम केव्हा सुरू केले जाणार, असा प्रश्न शेतकरी नवनाथ कोकरे, मंगेशराव कोकरे, सचिन ठोंबरे आदींनी उपस्थित केला आहे.