पुणे : पावसाळा सुरू झाला की बरसणार्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. पण, पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसर्यांसाठीही धोका तर निर्माण करीत नाहीये ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
भुशी धरणाजवळील एका धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोक वाहून जाण्याची घटना घडली. गेल्या वर्षी 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगडावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मध्यंतरी व्हायरल झाला. गर्दी इतकी होती की महादरवाजाजवळ पर्यटक जवळपास चार तास अडकून पडले होते. सरकायलाही जागा नसल्याने जवळपास चार तास पर्यटक एकाच जागी उभे होते.
फिरायला जाताना कुठे जायचे, यावर विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी अनेकवेळा दिला. पोहचण्यासाठी सोपे असलेल्या ठिकाणांवर सुटीच्या दिवशी किंवा विकेंडला प्रचंड गर्दी होते. तसेच काही अवघड ठिकाणी पोहचणे आपल्याला शक्य आहे का? किंवा तिथे सुरक्षिततेसाठी व्यवस्था आहे का? यावर नक्की विचार केला जाणे आवश्यक आहे.
सह्याद्री परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे धोकादायक झाले आहेत. सेल्फी, रील्स आणि फोटोच्या नादात स्वतःच्या पर्यायाने इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विसर पडू नये. धबधबा, दर्या यांसारख्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी किंवा रील्स बनविण्यासाठी नको ते धाडस करणे टाळायला पाहिजे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे, निसरड्या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातून भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळले पाहिजे.
ओळखीच्या व अनुभवी ग्रुपसोबत ट्रेकला जावे.
ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी.
ग्रुपकडे प्राथमिक उपचाराचे साहित्य असावे.
ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लिडर/ग्रुप यांची माहिती घरी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगला टॉर्च ठेवावा.
पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे.
शेवाळलेल्या जागा व पायर्यांवर जपून चालावे.
आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा म्हणून मोबाईल जपून वापरावा.
अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
अलीकडे दरवर्षी पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, गडकोट, किल्ल्यांवर भटकंतीसाठी, ट्रेकसाठी जाणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये अनेकवेळा काही ठिकाणी सातत्याने दुर्घटना होताना पाहायला मिळत आहेत. यामधील अनेक घटनांमध्ये मानवी चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे सर्व टाळणे सहजशक्य आहे. ही भटकंती सुरक्षित व्हावी, यासाठी काही गोष्टींचे पालन आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने शासनाने केवळ मार्गदर्शक सूचना न करता वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने सहकार्याने तेथे कायमस्वरूपी दोन जण तैनात करणे आवश्यक आहे. स्थानिक गिर्यारोक स्वयंसेवक म्हणून सहकार्य करतील.
उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ