बावडा: उजनी धरणातून भीमा नदीत, तर वीर धरणातून निरा नदीमध्ये पाणी सोडण्याच्या क्षमतेत वाढ करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा व निरा नदीच्या पाणीपातळीत रविवारी (दि. 14) मोठी वाढ झाली.
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 26 हजार 600 क्युसेक, तर वीर धरणातून निरा नदीपात्रात 3 हजार 200 क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी, सध्या भीमा व निरा नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. उजनी धरणामध्ये रविवारी सायंकाळी 6 वाजता 121.68 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 58.02 टीएमसी असून, त्याची टक्केवारी 108.31 आहे. (Latest Pune News)
उजनी धरणाच्या पाणीसाठ्यातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 180 क्युसेक, बोगद्यामधून 200 क्युसेक आणि मुख्य कालव्यातून 600 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. दरम्यान, उजनी धरणामध्ये दौंड येथून भीमा नदीपात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला असून, तो सध्या 3 हजार 270 क्युसेक एवढा आहे.
दुसऱ्या बाजूला वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडणे हे गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू झाल्याने धरणातून शनिवारी सायंकाळी 7 वाजता 3 हजार 200 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.
त्यामध्ये रात्री 12.30 वाजता वाढ करून विसर्ग 7 हजार 827 क्युसेक करण्यात आला. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विसर्ग रविवारी 10 वाजता पुन्हा 3 हजार 200 क्युसेक ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आगामी काळात शेतकऱ्यांचे लक्ष हे भीमा व निरा नदीवरील बंधारे पूर्णक्षमतेने अडवण्याकडे लागले आहे, असे प्रगतशील शेतकरी शरद जगदाळे-पाटील (टणू) यांनी सांगितले.