

भोर : भाटघर धरण (येसांजी कंक जलाशय) रविवारी (दि. 17) दुपारी दीडच्या सुमारास 100 टक्के भरले. वीजनिर्मतिी केंद्र व 45 स्वयंचलित दरवाजातून वेळवंडी नदीपात्रात 3 हजार 50 क्युसेकने विसर्ग सोडल्याने पूर्व भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेने धरण यंदा 15 दिवस उशिरा भरले.
धरण क्षेत्रातील सततच्या पावसामुळे जुलैअखेर वीजनिर्मतिी केंद्रातून, स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सोडण्यात आला होता.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे, मळे, पांगारी खोर्यात होत असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाने विश्रांती घेतली. त्या वेळी धरणात 92 टक्के पाणी साठा होता.
भाटघर धरणाची क्षमता 23 टीएमसी आहे. एकूण 81 दरवाजे असून, 45 स्वयंचलित, 36 अस्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजातून 1400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. शंभर टक्के धरण भरल्याने वेळवंडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हिर्डोशी खोर्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. निरा - देवघर धरण 98 टक्के भरले आहे. हे धरणही दोन दिवसात 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.
पानशेत आणि वरसगाव धरणक्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पावसाच्या रिमझिमीमुळे रविवारी (दि. 17) खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा जवळपास 90 टक्क्यांवर पोहचला. सायंकाळी 5 वाजता धरणसाखळीत 26.14 टीएमसी म्हणजे 89.67 टक्के पाणीसाठा झाला होता.
घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ओढे, नाल्यांतून पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीत 0.27 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. शनिवारी (दि. 16) सायंकाळी 5 वाजता धरणसाखळीत 25.87 टीएमसी पाणी होते. गेल्या 3 दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला धरण क्षेत्रात रिमझिम सुरू आहे. अधूनमधून सरी पडत आहेत.
वरसगाव धरण विभागाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण म्हणाल्या, धरण माथ्यापेक्षा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. जोरदार पाऊस पडत नाही, मात्र रिमझिम सुरू असल्याने धरण साठ्यात हळूहळू पाण्याची भर पडत आहे.
सकाळपासूनच पानशेत, वरसगाव, टेमघर धरण खोर्यात रिमझिम होती. दुपारी 2 वाजल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, तुरळक रिमझिम सुरू आहे. खडकवासला पाणलोट क्षेत्रातील सिंहगड, मांडवी, मालखेड, खानापूर परिसरात हलका पाऊस झाला. तसेच अधूनमधून सरीदेखील पडत आहेत. दिवसभरात पानशेत येथे 8 मिलिमीटर, वरसगाव येथे 9 मिलिमीटर, टेमघर येथे 6 मिलिमीटर, तर खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला.