

राजगुरुनगर: शहरातील न्यायालय आवारात असलेल्या वकील बार असोसिएशनच्या कार्यालयात एक दिवस डिस्पोजेबल पेपर कपऐवजी काचेच्या कपातून चहा पिण्यास सुरुवात झाली खरी; पण हे कप धुणार कोण? यावर वाद होऊन दुसर्या दिवसापासून पुन्हा बंदी असलेल्या पेपर कपातून चहा पिण्यास सुरूवात झाली.
हीच स्थिती शहरातील सर्व शासकीय कार्यालयांत, रुग्णालयांमध्ये, खासगी आस्थापनांत देखील पाहायला मिळू लागली आहे. सर्वत्रच डिस्पोजेबल पेपर कपमधूनच चहा पीत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या या कपसाठी पर्यायच उपलब्ध नसल्याचे चहा विक्रेते सांगत आहेत.
खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लेखी आदेश काढून डिस्पोजेबल पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये पिणे धोकादायक असून, यामुळे कॅन्सरसारखे गंभीर अजार ओढवू शकतात. यामुळेच या कपमधून चहा, कॉफी पिण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. परंतु, सध्या शहरातील सर्वच तहसीलदार कार्यालयांसह अन्य सर्व ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या कपमधूनच चहा, कॉफी देण्यात येत आहे.
डिस्पोजेबल पेपर कपातून चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये पिल्यास मायक्रोप्लास्टिक कण पोटात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पेपर कप हे कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागील मुख्य कारण आहे.
कपचा कर्करोगाशी थेट संबंध नसला तरी कप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायने जसे की, मायक्रोप्लास्टिक्स किंवा परफ्लुरोआल्काइल पदार्थ ( झऋअड) यांमुळे कर्करोग होऊ शकतो. यामुळेच या कपमधून गरम चहा, कॉफी पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कार्यालयांमधून होण्याची गरज आहे.