

यवत : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दौंड तालुक्यात दाखल झाला. यावेळी दौंडकरांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त आणि भक्तिमय वातावरणात माऊलींचे स्वागत केले.
शनिवारी सकाळी लोणी काळभोर येथील मुक्काम उरकून दुपारचा विसावा उरुळी कांचन येथे घेतल्यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा उरुळी कांचन गावाची हद्द पार करून हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास दाखल झाला. पालखीच्या आगमनावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करत तुकोबारायांचे स्वागत केले.
रविवारी सकाळपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असल्याने पालखी सोहळ्यातील वारकरी आनंदात विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करताना पाहायला मिळाले. यावर्षी पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सुमारे पाच मिनिटे थांबल्याने परिसरातील भाविकांना तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
यावेळी पालखी सोहळ्यातील विश्वस्तांचे स्वागत दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी केले. पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी हवेली तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
दौंड तालुक्याच्या वतीने पालखी स्वागतासाठी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे, बोरीभडकच्या सरपंच कविता कोळपे, जिल्हा परिषद सदस्या गायत्री खळदकर, सागर शेलार, साहेबराव पोळ, अविनाश कुदळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन दोरगे, भाजप राहुल हंडाळ पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस, पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दौंडकरांचा प्रेमळ स्वागत स्वीकारून तुकोबारायांचा पालखी सोहळा पुढील यवत मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.