पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी सात उपायुक्तांची नेमणूक केली आहे. या अधिकार्यांना रात्रपाळीत आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून कामाकाजावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित असला, तरी तिथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसतात. पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी होते. कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास रस्ते जलमय होतात, तुंबतात. सखल भागात घरात पाणी शिरते, काही ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरते. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडतात. अशा वेळी महापालिकेचे सांडपाणी व्यवस्थापन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पथ विभाग, उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांसह अग्निशामक दल मदत कार्यात सक्रिय होते. मात्र, या कामात योग्य समन्वय साधला जात नाही.
या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्तांनी सात दिवसांसाठी सात उपायुक्तांची नेमणूक केली आहे. या उपायुक्तांनी आपल्याला नेमून दिलेल्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन कक्षात रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे काम करायचे आहे. हे नियोजन 11 जुलैपर्यंतच्या करण्यात आले आहे.