पुणे : कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास 50 वर्षे झाली. तो अजून दिमाखात उभा आहे. सिंधुदुर्गातील पुतळा अवघे 8 महिनेसुद्धा टिकला नाही. हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पाप आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. त्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम जनतेने करावे.
भाजपला महाराष्ट्रात कुठलेही स्थान नाही, असा इशारा देण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे, असे घणाघाती आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी केले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी डॉ. कोल्हे कोथरूडमध्ये आले होते, त्या वेळी ते बोलत होते. त्यांचे कोथरूडमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
उमेदवार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, विकास पासलकर, माजी नगरसेवक शिवा मंत्री, दामू कुंबरे, नंदू घाटे, डॉ. अभिजित मोरे, स्वप्निल दुधाने, रवींद्र माझिरे, गिरीश गुरनानी, किशोर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, कोथरूडचा विकास फक्त चंद्रकांत मोकाटेच करू शकतात. कोल्हापूरचे पार्सल मतदारांनी परत कोल्हापूरला पाठवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचे समयोचित भाषण झाले.