

आळंदी: महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीला सध्या वायुप्रदूषणाचा विळखा बसला असून, रोजच उठणारे धुराचे लोट आणि उघड्यावर होणारी कचऱ्याची विल्हेवाट यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी केवळ आळंदी नगरपरिषदच जबाबदार नसून, लगतच्या ग््राामपंचायती हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्याचे चित्र आहे.
चऱ्होली ग््राामपंचायतीचा कचरा वडगाव घेणंद रस्त्यावर असलेल्या टेकडीवर टाकला जात असून, तो रोज पेटताना दिसून येतो. यामुळे या रस्त्यावर दिवसभर धुराचे लोट असतात. आळंदी नगरपरिषद कचरा डेपो हनुमान वाडी भागातील डोंगरावर असून, त्या ठिकाणी देखील महिन्यातून दोनदा कचरा पेटल्याची घटना घडतेच.
चिंबळी येथील माजगावजवळ असलेल्या डोंगरावर देखील मोठ्या प्रमाणात कचरा पेटलेल्या अवस्थेत दिसून येतो. शिवाय आळंदी शहराच्या र्नैऋत्य दिशेस असलेला मोशी येथील पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा डेपो देखील आळंदी भागात प्रदूषणाला खतपाणी घालतो. आळंदी शहराच्या पूर्व बाजूला असलेल्या मरकळ औद्योगिक वसाहतीत देखील धुराचे लोट रोज दिसून येतात.
एकंदरीतच आळंदी शहराच्या पूर्वेला औद्योगिक कचऱ्याचे धुराचे लोट, पश्चिमेला केळगाव हद्दीवरील कचरा व चिंबळी, केळगाव हद्दीतील जाळण्यात येणारे कचऱ्याचा धूर, उत्तरेला आळंदी नगरपरिषद कचरा डेपो, चऱ्होली ग््राामपंचायत कचरा डेपो यातून निघणारा धूर आणि दक्षिणेला पिंपरी-चिंचवड शहरातून येणारे धुराचे लोट व इंद्रायणीतील प्रदूषित पाणी असे चौफेर प्रदूषणाने शहर प्रदूषणाच्या छायेत गुरफटले आहे. त्यातच भर म्हणून की काय बुधवारी (दि. 6) चऱ्होली हद्दीत वडगाव रस्त्यावर असलेल्या जलजीवन मिशन कामाकरिता ठेवण्यात आलेले पाईप देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यातून देखील मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार होऊन परिसरात दुर्गंधी पसरली होती.
नागरिकांचे जगणे झाले असह्य
एकंदरतीच आळंदी व लगतच्या परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असे असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काहीच कारवाई करताना दिसून येत नाही. इतर स्वायत्त संस्था देखील आपल्या हद्दीपुरता विचार करून याकडे कानडोळा करताना दिसून येतात.