वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या मागण्या रास्त असून, या समाजाला आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी होणार्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, असे निवेदन आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले. शनिवारी (दि. 17) आमदार भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे युवक आपले गार्हाणे घेऊन आले होते. या वेळी आमदार भरणे यांनी त्यांच्याशी संवाद साधत आपणही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.
आ. भरणे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचे जनक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावू लागल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र बनू लागल्या आहेत. या समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले असून, त्या दिवशी आपणास गोड बातमी येईल, अशी आशा आहे. या अधिवेशनात आपण इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आग्रही असणार आहे. प्रामुख्याने तत्पूर्वीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या भावना पोहचविल्या असून, मराठा समाजाच्या सर्व मागण्या व सगेसोयरे शब्दाचा अंतर्भाव असलेल्या अधिसूचनेचे शासननिर्णयात रूपांतर करण्याबाबत विनंती केल्याचे सांगितले. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वालचंदनगर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे युवक शनिवारी आमदार भरणे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीने गेले होते. मात्र, आमदार भरणे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ऐनवेळी युवकांनी येथील ठिय्या आंदोलन स्थगित केले.
हेही वाचा