पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेल्या 2-3 वर्षांपासून गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. परीक्षा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे, मुलींना मोफत शिक्षण योजनेची सर्व महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी करावा लागत असणारा संघर्ष अशा विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर ’महाआक्रोश मोर्चा’ काढत विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अभाविपने सातत्याने पत्रव्यवहार, चर्चा, पाठपुरावा करून देखील त्यावर कुठलीही ठोस कारवाई विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आली नाही. पुनर्मूल्यांकनाच्या बदललेल्या निकषांमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालण्यात आला आहे. विद्यापीठामध्ये कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता अशा सर्व संविधानिक पदांवरती सध्या प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत.
विद्यापीठ परिसरात राहणार्या विद्यार्थ्यांना रोजच गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वसतिगृहातील समस्या, भोजनाचा खालावत जाणारा दर्जा, कॅम्पसमध्ये गांजा सापडणे, उंदरांचा हैदोस, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सर्वच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संबंधित मोर्चा काढला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोर्चाला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपाशी जाहीर सभा पार पडली. या वेळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देत अभाविपच्या शिष्टमंडळाने चर्चेसाठी यावे, अशी विनंती केल्यानंतर अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या शिष्टमंडळाने तब्बल दीड तास कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव आणि प्रभारी परीक्षा नियंत्रक यांच्याशी चर्चा करत सर्व प्रश्न आणि मागण्या मांडल्या.
या वेळी जे प्रश्न लगेच सोडविणे आवश्यक आहे, त्यावर तत्काळ तोडगा काढण्यात येईल व सर्व मागण्यांवर संबंधित अधिकार मंडळामध्ये चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. तसेच, सर्व प्रश्न आगामी काही दिवसांमध्ये न सुटल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
विद्यापीठ प्रशासन गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थीविरोधी धोरण राबवत आहे. अनेकदा निवेदन, चर्चा आणि पत्रव्यवहार करून देखील या गंभीर समस्यांकडे पाठ फिरवण्याचे काम कुलगुरू करत आहेत. अभाविपच्या आंदोलनाने कुलगुरू, विद्यापीठ प्रशासनाला झुकण्यास भाग पाडले. संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहोत.
- अथर्व कुलकर्णी, प्रदेशमंत्री, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश