मंचर : पुढारी वृत्तसेवा : बाजारात टोमॅटो चांगलाच 'भाव' खाऊ लागला आहे. जुन्नरच्या नारायणगाव उपबाजारात एका कॅरेटला 700 रुपयांच्या वर उच्चांकी दर मिळू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर इतर भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दरात मोठी वाढ झाली आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, कळंब, नारोडी, पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, भराडी, पारगाव, काठापूर भागात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे जोरात सुरू आहेत. उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले गेले आहे. परंतु, सुरुवातीला बाजारभावाची साथ मिळाली नाही. अनेक शेतकर्यांनी बागा सोडून दिल्या. आता मात्र टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. येथील टोमॅटोला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
पाऊस आणि टोमॅटोची घटलेली आवक यामुळे नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला आता उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून एक नंबर टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला तब्बल 800 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर सरासरी हा भाव 600 ते 900 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.
येत्या काही दिवसांत टोमॅटोचा दर हा प्रतिकॅरेट 1 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने गेल्या 3 दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली असून भाव वाढले आहेत, असे व्यापारी सचिन टेमकर यांनी सांगितले.
दीड एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले आहे. अंदाजे एकरी 3 लाख रुपये खर्च आला आहे. सध्या बाजारात टोमॅटोला 80 ते 90 रुपये किलोला भाव मिळू लागला आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 तोडे झाले असून लागवडीचा खर्च वसूल झाला आहे. आतापर्यंत टोमॅटोचे 700 कॅरेट गेले असून अजून सरासरी 2 हजार कॅरेट उत्पादन होऊ शकते, असे टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक गावडे, सुभाष गावडे यांनी सांगितले.
हेही वाचा