Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास

Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित असून, विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. हा प्रकार मतदारांची दिशाभूल करणारा असल्याचे मत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी (दि. 13) व्यक्त केले. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सहकुटुंब लांडेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासमवेत पत्नी कल्पना आढळराव पाटील, मुलगा अक्षय आढळराव पाटील, सून माधुरी आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील, सून नताली आढळराव पाटील उपस्थित होते.

या वेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आढळराव पाटील म्हणाले की, या वेळची निवडणूक महत्त्वाची असून, सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केला. शेवटच्या 15 दिवसांत आमचे वरिष्ठ तसेच पक्षाचे नेते अजित पवार यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ही निवडणूक आम्ही जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्याने ते वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करीत जनतेचे लक्ष विचलित करीत होते, असे देखील आढळराव पाटील यांनी स्पष्ट करीत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. चाकण येथे झालेल्या सभेत मोठ्या प्रमाणात पाऊस आला, तरीही जनता अजित पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी थांबून राहिली. वरुणराजाने आम्हाला दिलेला हा आशीर्वाद असून, आम्ही नक्की विजयी होणार, अशी खात्री असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news