शब्दाचे पक्के असाल, तर माघार घ्यायची तयारी करा; कोल्हेंचे आढळराव पाटलांना आव्हान | पुढारी

शब्दाचे पक्के असाल, तर माघार घ्यायची तयारी करा; कोल्हेंचे आढळराव पाटलांना आव्हान

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारी शिवाजीराव आढळराव पाटील यांची मोडस खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी कोपरा सभेत जाहीरपणे मांडली. मी बोलतो तर पुराव्यानिशीच बोलतो, असे म्हणत हा फक्त ट्रेलर आहे, शब्दाचे पक्के असाल, तर माघार घ्यायची तयारी करा, अस प्रतिआव्हान पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे हे गुरुवारी सातारा दौरा करून शुक्रवारी पुन्हा आपल्या मतदारसंघात गावभेट करीत कोपरा सभा घेत होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, स्वप्निल गायकवाड, पोपट शेलार, विद्या भुजबळ, विश्वास ढमढेरे, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, सुभाष कळसकर, संजय देशमुख, जीवन तांबे, शरद निंबाळकर, राहुल करपे, गोरक्ष गदाडे, मच्छिंद्र गदादे यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, ज्यांनी 15 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते जेव्हा सांगतात की, मी हजार ते अकराशे प्रश्न विचारले. त्यातले 60 ते 70 प्रश्न असे आहेत, की ज्या संरक्षण खात्याला, रेल्वेला त्यांची कंपनी काहीना काही गोष्टी सप्लाय करते. हे प्रश्न असे आहेत की, संरक्षण खात्यात, रेल्वेत ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केव्हा खरेदी केल्या जाणार, कोणाकडून खरेदी केल्या जाणार, या खरेदीचा नेमका टप्पा काय आहे, असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल, तर असे प्रश्न विचारून परदेशातील स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करून घेणारा लोकप्रतिनिधी असेल, तर त्याला लोकप्रतिनिधी म्हणायचे की लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचे, हे विचारणे गरजेचे आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

त्यांना पुराव्यांनिशी दाखवतो, काय पुरावा आहे, हे आत्ता सांगितले, असे म्हणत डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, त्यांनी आता आव्हान दिले आहे. शब्दाला माणूस पक्का असेल, तर माघारी घेण्याची तयारी करावी. गेली पाच वर्षे मी संसदेत बोलताना पुराव्यांशिवाय कधी बोललो नाही, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, मी कधीच कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही. पण, सातत्याने जेव्हा नटसम्राट, नौटंकी, यासह खालच्या पातळीवरची भाषा केली जाते, तेव्हा मला प्रश्न पडत होता. मतदारसंघात दाखवायचे की, मी तुमच्यासाठी काम करतोय आणि दिल्लीत जाऊन स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करायचे, हा अनुभव घेतला, असे म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.

हेही वाचा

Back to top button