पुणे : अवकाळीचा 82 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिल महिन्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे 21 जिल्ह्यातील सुमारे 82 हजार 264 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ-कराठवाड्यातील पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे.
सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले असून ते तब्बल 53 हजार 402 हेक्टरवरील आहे. या शिवाय अन्य जिल्ह्यातील शेतीपिके व फळपिकांचे झालेले नुकसान हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. सोलापूर 1447, नंदुरबार 122, छत्रपती संभाजीनगर 163, जालना 134, धाराशीव 308, बीड 1021, लातूर 95, नांदेड 749, परभणी 3, हिंगोली 297, वाशिम 3888, बुलढाणा 6513, अकोला 11157, यवतमाळ 2494, वर्धा 308, नागपूर 90, भंडारा 13, गोंदिया 45, चंद्रपूर 4, गडचिरोली 11 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीमध्ये प्रामुख्याने केळी, पपई, टरबूज, उन्हाळी ज्वारी, बाजरी, मका, कांदा, भाजीपाला, आंबा, चिकू, लिंबू, गहू, मुग, हरभरा, तीळ, संत्रा, तीळ, भात आदी शेती पिके व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने अन्य जिल्ह्यातही शिरकाव केलेला आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.