हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा
आयटीनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये दर तीन महिन्यांनी नवा सरपंच, नवा उपसरपंच आणि आता नवा ग्रामविकास अधिकारी हाच विकासाचा फॉर्म्युला, असे चित्र उभे राहिले आहे; मात्र खरोखरच हिंजवडीचा विकास होतो आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दर तीन महिन्यांनी गाव कारभारी बदलले जातात; मात्र हे होत असताना गावच्या विकासाला खीळ बसत आहे. मागील काही महिन्यात तीन सरपंच, तीन उपसरपंच आणि आता चार ग्रामसेवक बदलल्याने गावच्या विकासाच्या चाव्या नक्की कुणाच्या हाती आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच काहींच्या मर्जीनुसार येथील ग्रामविकास अधिकारी काम करत नसल्याने त्यांच्या बदलीचा तक्रार अर्ज थेट पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या जागतिक उद्योगनगरीचा कारभार सद्या रामभरोसे सुरू आहे.
हिंजवडीच्या ग्रामविकास अधिकार्यांविरोधात विद्यमान सरपंचासह सर्व सदस्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याकडे तक्रार अर्ज केला आहे. तेव्हापासून हे अधिकारी रजेवर आहेत. त्यांच्या जागी पिरंगुट येथे रुजू असलेले ग्रामविकास अधिकार्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती.
मात्र त्यांच्या नावाचा विचार न करता माणचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे प्रभारी कारभार देण्यात आला. परिणामी कोटींची उलाढाल असणार्या हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार मात्र, ग्रामविकास अधिकार्यांविना खोळंबला असल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. वास्तविक ग्रामपंचायत सदस्यांना आपल्या मर्जीतील ग्रामसेवक असावा ही इच्छा असते.
त्यामुळे विकासकमात मर्जीतील कंत्राटदार नेमण्यास मदत होते. ग्रामपंचायतचे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व कचरा व्यवस्थापनाच्या निविदा मिळवून देण्यामध्ये मोठा रस असल्याने ते ग्रामविकास अधिकार्यांवर दबावतंत्र वापरतात. त्यामुळे पुढील काळात या राजकारणाची दिशा काय असणार आहे याकडे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.