पुणे : शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या तरुणीचा खंडणीसाठी अपहरण करुन खून | पुढारी

पुणे : शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या तरुणीचा खंडणीसाठी अपहरण करुन खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षीय तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले तरी तरूणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयाकडे ९ लाखांची खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी नगर तालुक्यातील सुपा कामरगाव च्या परिसरातून ताब्यात घेतला.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. विमानतळ, मुळ रा. हरंगुळ बुद्रुक, ता. लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. तरुणी अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (४९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ३० मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुली सोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतली होती. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशी या संपूर्ण घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. शिवम हा मयत तरुणीचा मित्र आहे. त्यांनी झुम कार ॲपवरून गाडी भाडयाने घेतली होती. ३० मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला.

प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि लालसेतून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज झाला. आणि त्यातूनच त्यांनी ही कृत्य केले. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुणे पुढील तपास करत आहेत.

Back to top button