अद्यापही शंभर लाख टन उसाचे गाळप अपेक्षित | पुढारी

अद्यापही शंभर लाख टन उसाचे गाळप अपेक्षित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ऊस गाळप हंगाम तीन महिने चालण्याचा साखर आयुक्तालयाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला असून, मार्च महिन्यातही कारखान्यांची धुराडी सुरू राहतील, असे चित्र आहे. सद्यःस्थितीत 906 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या अपेक्षित अंदाजाइतके ऊस गाळप आताच पूर्ण झाले आहे. 10.03 टक्के सरासरी उतार्‍यानुसार साखरेचे 91 लाख टन उत्पादन हाती आले आहे. अद्यापही 80 ते 100 लाख टन ऊस गाळप होणे बाकी असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

राज्यात चालूवर्ष 2023-24 च्या हंगामात मंत्री समितीच्या बैठकीतील माहितीनुसार ऊस पिकाखालील एकूण क्षेत्र 14.07 लाख हेक्टरइतके आहे. त्यातून 1 हजार 22 लाख टन उसाची उपलब्धता अपेक्षित होती. प्रत्यक्षात 90 टक्के ऊस गाळपास येणे अपेक्षित धरता साखर कारखान्यांकडून 921 लाख टन उसाचे गाळप आणि 103.58 लाख टन साखरेचे उत्पादन हाती येण्याचा अंदाज होता. चालूवर्षी हंगाम तीन महिने चालण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यापेक्षा अधिक हंगाम सुरू आहे. मार्च महिनाअखेर अद्यापही सुमारे ऐंशी ते शंभर लाख उसाचे गाळप अपेक्षित मानले जात आहे. त्यातून साखरेचे उत्पादनही 105 लाख टनांहून अधिक होईल, अशी सद्यःस्थिती आहे. त्यामुळे उसाच्या उपलब्धतेची आकडेवारी आणि त्यावरून प्रत्यक्षात धरण्यात येणार्‍या ऊस गाळपाचा अंदाज दरवर्षीप्रमाणेही चालूवर्षीही चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

13 साखर कारखान्यांची धुराडी बंद

राज्यात यंदाच्या हंगामात 103 सहकारी, 104 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. 29 फेब्रुवारीअखेर 13 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ऊस संपल्याने बंद झाला आहे. त्यामुळे दैनिक ऊस गाळप क्षमताही कमी झाली असून, ऊसतोडणीस मजुरांची टंचाई भेडसावत असल्यानेही हंगाम मंदावल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

कोल्हापूर विभागाची आघाडी कायम…

राज्यात सर्वाधिक ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतार्‍यात कोल्हापूर विभागाने अग्रस्थान कायम ठेवले आहे. कोल्हापूर विभागात 209.87 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 11.39 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 238.97 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागाने 192.59 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 10.31 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 198.64 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. सोलापूर विभागात 190.47 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 9.19 टक्के उतार्‍यानुसार 174.99 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे.

अहमदनगर विभागात 115.33 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 9.69 टक्के उतार्‍यानुसार 111.74 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 94.64 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 8.7 टक्के उतार्‍यानुसार 73.65 लाख क्विंटल साखर उत्पादन हाती आले आहे. नांदेड विभागात 101.71 लाख टन ऊस गाळप होऊन 9.99 टक्के उतार्‍यानुसार 101.65 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे. अमरावती विभागात 8.47 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 9.2 टक्के उतार्‍यानुसार 7.79 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. नागपूर विभागात 3.35 लाख टन ऊस गाळप, 5.19 टक्के उतारा आणि 1.74 लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button