पिके पाण्याअभावी जळू लागली : कोकडेवाडीतील शेतकर्यांचा आंदोलनाचा इशारा
न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील शेतीला चासकमान डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी अधिकारी-कर्मचार्यांच्या गलथान कारभारामुळे टेलच्या कोकडेवाडी, आंधळगाव भागात पोहचलेले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या पाण्याचे योग्य नियोजन करावे; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा न्हावरेचे माजी उपसरपंच जयंवतराव कोकडे व शेतकरी बजरंग मारणे, सुरेश कोकडे यांनी दिला आहे.
या भागासाठी महिन्याभरापासून चासकमान डाव्या कालव्यातून पाणी सोडले. मात्र अद्यापही ते टेलच्या भागात पुरेसे पोहोचले नाही. पाणी नेमके मुरते कुठे, या प्रश्नाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाण्याअभावी ऊस, कांदा, गहू आदी पिके जळून जात आहेत. प्रथम टेलच्या भागात पाणी देणे हे हा नियम असतानाही चारी नंबर 21च्या पाच चार्यांवर अधिकार्यांनी कोकडेवाडी परिसरात पाण्याबाबत दुजाभाव केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. शेतकर्यांनी संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता गुंजाळ यांच्याशी संपर्क साधत त्यांच्यासह या परिसराची समक्ष पहाणी करून सत्यस्थिती दाखवून दिली.
हेही वाचा