

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. तसेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 27 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोरडे हवामान राहिल्यामुळे या भागात थंडी वाढली आहे. परिणामी, बुधवारी या भागात गारठा चांगलाच वाढला. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नगर येथे 12. 3 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढला आहे; तर 24 फेब्रुवारी रोजी आणखी पश्चिमी चक्रवात या भागात तयार होणार आहे. या प्रभावामुळे जोरदार थंडी तसेच बर्फवृष्टी या भागात होत आहे. या चक्रवाताचा प्रभाव उत्तर भारतात झाला असून, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह आसपासच्या भागांत पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. याचबरोबर दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडू, तेलंगणा या भागापर्यंत विदर्भ पार करून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात 27 फेब्रुवारीपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा