गोळीबार झाल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने मोहोळचे कार्यकर्ते कोथरूड येथील रुग्णालयाबाहेर जमले होते. मोहोळच्याच परिसरात त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी खून करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याच्याच निकटवर्तीयांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक वाद की वर्चस्व संघर्ष, अशी खुनाची विविध कारणे पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर विविध संघटनांच्या आणि राजकीय व्यासपीठांवर दिसून येत होता.
गुन्हेगारी कृत्यानंतर खर्या अर्थाने मोहोळ चर्चेत आला तो दहशतवादी कतिल सिद्धिकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये खून झाल्यावर. त्याचा आरोप मोहोळवर होता. हे प्रकरण देशभर चर्चिले गेले. त्याचा फायदा घेत त्याने आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले होते. या गुन्ह्यातही त्याला अटक झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे पुण्यातील कुख्यात टोळ्यांच्या वर्चस्ववादाचा संघर्ष शांत होता. अनेक टोळीप्रमुख आणि त्यांच्या सदस्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. मात्र, आता मोहोळवरील गोळीबारामुळे कोथरूडमधील गँग आणि गँगस्टर पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. यामुळे त्याच्या कार्यालयात नातेवाईक आणि चाहत्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून बाहेर पडत होता, तेवढ्यात गर्दीतून चौघे जण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर पिस्तूलातून बेछूट गोळीबार केला. यामध्ये त्याच्या खांद्याला आणि त्याखाली गोळ्या लागल्या. हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी गोळ्याच्या पुंगळ्या पडल्या होत्या.
कतिलच्या खुनानंतर शरद मोहोळ चर्चेत