बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; शशिकांत शिंदे | पुढारी

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; शशिकांत शिंदे

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही. बारामतीत आल्यानंतर वेगळं बोलायचं,  मराठवाड्यात गेल्यानंतर बारामतीवर बोलायचं हा प्रकार योग्य नाही. अशा शब्दात माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
शिंदे यांनी रविवारी (दि. १८) बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शुक्रवारी (दि. १८) धाराशीव येथील पांगदरवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमीपूजन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी बारामतीने मराठवाड्याचे पाणी अडवल्याचा आरोप केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लागलीच तो फेटाळला होता. माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनीही आता फडणवीस यांचा समाचार घेत त्यांच्या विधानाबद्दल नापंसती व्यक्त केली.
शिंदे म्हणाले, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा एकट्या आमदार, खासदार यांना नसतो, तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. कोणतीही गोष्ट ठरताना ती फक्त एकेका आमदार, खासदारांपुरती ठरत नाही, तर ती संपूर्ण राज्य किंवा देश समोर ठेवून तो निर्णय घेतलेला असतो. अशा वेळी कोणावर  वैयक्तिक टीका करणे हे बरोबर नाही. राजकारणाचा अलिकडचा स्तर घसरलेला आहे. कोणताही मंत्री हा कोणत्याही एका भागाचा नसतो, कोणताही नेता हा एका भागाचा नसतो, तो संपूर्ण राज्य किंवा देशाचा असतो. परंतु अलिकडच्या काळामध्ये वेगळेच राजकारण पाहायला मिळत आहे. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामतीने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले, असा अपप्रचार विरोधक करतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. वास्तविक आम्ही मंत्रिमंडळात असताना मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. कुठेही कुणाचेही पाणी अडवलेले नाही असे शिंदे म्हणाले.

Back to top button