देशात छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे : फडणवीस | पुढारी

देशात छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे : फडणवीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  या देशात एकच जाणते राजे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाला त्यांच्या नेत्यांना ‘जाणता राजा’ म्हणायचे असेल, तर म्हणू द्या. जनता म्हणणार नाही, असे सांगतानाच छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्यरक्षक आहेत; पण त्यांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर यावरून वाद सुरू असून, तो रस्त्यावर आल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले. ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोहच आहे, असे ते म्हणाले.

टीका करताना पातळी सोडू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, सुप्रिया सुळेंनी जे म्हटले आहे, त्याचे मी स्वागत करतो; पण सुप्रिया सुळेंनी जे मत मांडले आहे ते आधी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर टीका करत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोणीही राज्यातील उद्योग पळवू शकत नाहीत

मुंबई आणि महाराष्ट्राची ताकद बघा. देशात कुणालाही उद्योग आपल्याकडे आकृष्ट करायचा असेल किंवा औद्योगिक समेट करायची असेल; तर त्यांना मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही, ही आपली ताकद आहे. कुणीही, कुणाचे उद्योग पळवून घेऊ जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील उद्योग तर कुणीच पळवून घेऊ जाऊ शकत नाही. प्रत्येक राज्याची आपापली ताकद असते, त्या-त्या ठिकाणचा भूगोल असतो, नैसर्गिक फायदे असतात. तसे त्या ठिकाणी उद्योग जात असतात. गुजरात आणि राजस्थानचा विचार केला, तर वाळवंटामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता आहे. सोलर पॅनेलसाठी जमीन उपलब्ध असल्याने ग्रीन हायड्रोजनसारखे उद्योग तिकडे जात आहेत. कुणी, कितीही बोलले तरी शेवटी भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईच असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button