मंचर: हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात गुरुवार (दि. 10) अखेर केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दरम्यान धरणात 33.06 टक्के पाणीसाठा होता. आंबेगाव, जुन्नर, शिरूर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांसह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यास आगामी काळात पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे; अन्यथा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता पाहता आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येऊ शकते, अशी भीती जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण दरवर्षी हमखास शंभर टक्के भरते.
धरणातील पाणी उजव्या कालव्यातून आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावांना दिले जाते. डाव्या कालव्याच्या माध्यामातून आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात पाणी सोडले जाते. तेथून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत या तालुक्यांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यापर्यंत पाणी जाते.
डिंभे धरणातील पाण्यावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांची शेती तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. परंतु, यावर्षी डिंभे धरणामध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणार्या कालखंडात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डिंभे धरणात 33.06 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच, शेतपिकांनाही जास्त पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. एकंदरीत, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प, नारायणगाव