

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी काही दिवस तात्पुरत्या स्वरूपात आरण लावून कांदा ठेवला होता.
अनेक दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असून कडक तापमानात कांद्याचे वजनात घट होऊन आर्थिक नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन बेट भागातील शेतकरी कांदा विक्री करताना पाहायला मिळत आहे.
जांबुत, पिंपरखेड, काठापूर, चांडोह, फाकटे, वडनेर या बेट भागातील गावामध्ये शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी हंगामात कांदा लागवड केली होती. कांदा काढणी सुरू झाल्यावर कांद्याच्या बाजारभावात घसरण होऊन सध्या कांद्याचे दर प्रति 10 किलोस 120 रुपयांवर स्थिर आहेत.
साठवणूक व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवण केली आहे. साठवणूक व्यवस्था नसल्याने बहुतांश शेतकर्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने तात्पुरती आरण लावून कांदा ठेवला आहे.
मात्र सध्याच्या मे महिन्यातील कडक तापमानाचा फटका कांद्याला बसून कांद्याचे वजनात घट होणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणार नसल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवताना दिसत आहेत.