

पालघर : दर पावसाळ्यात जव्हार ,मोखाडा या भागातील वीज जाण्याचे प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे थोडा वादळी वारा झाला किंवा पावसाचे प्रमाण वाढले की या भागातील वीज नेहमीच गायब होते. आजही कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आणि पुन्हा एकदा पाऊस इन आणि वीज आउट याची प्रचिती आली अगदी पाऊस सुरू झाल्यापासून कित्येक तास जव्हार मोखाडा तालुक्याची वीज गायब होती.
यानंतर वीज अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी येते किती पुन्हा दोन ते अडीच तास गायब होते यामुळे जव्हार मोखाडा कर मेटाकुटीला आलेले आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा नेमका कधी निघणार असा सवाल देखील आता नागरिक विचारू लागले आहेत. अशावेळी महावितरणाशी संपर्क साधल्यानंतर एक तर वीज वरून गेली किंवा गंजाड इथून गेली हेच उत्तर जवाहर मोखाड्यातील नागरिकांना ऐकायला मिळते मात्र हे उत्तर गेल्या पंचवीस वर्ष किंबहुना त्यापेक्षाही आधीपासूनच मिळत असल्याने यावर खरंच तोडगा काढणार आहे की नाही हाच खरा संशोधनाचा भाग आहे.
यावर खरंतर तोडगा काढण्याऐवजी वर्षानुवर्षी हीच स्थिती या भागाची राहिलेली आहे यामुळे 2022 मध्ये डहाणू वरून थेट जव्हार येथे उपकेंद्राला वेगळा वीजपुरवठा होण्यासाठी एक काम हाती घेण्यात आले. 132 केवीचा उपकेंद्र जव्हार मधील जामसर या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच तयार झालेले आहे मात्र तिथून जव्हार मोखाड्यासाठी होणारा वीजपुरवठा अद्याप झालेला नाही.मात्र हे काम चालू असल्याचे नेहमी सांगण्यात येते.
यानुसार याबाबत माहिती घेतली असता हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महावितरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर आलेले आहे. कारण की आज घडीला हे काम पाहता संत गतीने असल्यामुळे मार्च 2026 पर्यंत तरी हे काम पूर्ण होईल का याबाबत सांशकता निर्माण झाली आहे यामुळे जव्हार मोखाड्यासाठी मिळणारा हक्काचा वीजपुरवठा नेमका कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज घडीला जव्हार मोखाड्यासाठी वीज पुरवठा हा डहाणू गंजाड कवडास मार्ग होतो. यामुळे डहाणू भागात जरी पाऊस झाला आणि तिकडे एखादं झाड लाईनवर पडल किंवा विविध प्रकारची नादुरुस्ती झाली तरी जव्हार मोखाडा तालुक्याला संपूर्ण दिवस अंधारात राहावे लागते. यामुळे जव्हार मोखाडासाठी स्वतंत्र वीजपुरवठा असावा या हेतूने शासनाने गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच जव्हार मध्ये एका वीज उपकेंद्राची निर्मिती झाली मात्र तिथपर्यंत वीज जोडणी अद्याप झालेली नाही. सध्या या 40 किलोमीटर लाईनचे काम चालू आहे डिसेंबर 2022 मध्ये या कामाची सुरुवात झाली आहे.
या लाईन मध्ये चार आउटलेट होणार असून वनविभागाच्या जागेतून तब्बल 17 किलोमीटर तर त्या व्यतिरिक्त 16 किलोमीटर अशी ही लाईन खेचली जाणार आहे यासाठी वनविभागाच्या 48 हेक्टर जागेचा वापर होणार आहे एकूण 148 वीज पोलाची निर्मिती होणार असून यामधील वनविभागाच्या जागेत 100 आणि त्या व्यतिरिक्त 48 पोल उभे राहणार आहेत यातील आज घडीला 69 पोल बसविण्याचे काम झाले असून यातील 41 वन विभागा व्यतिरिक्त क्षेत्राच्या जागेत तर तर 15 वनक्षेत्राच्या हद्दीत वीज खांब उभे करण्यात आले आहेत. कामासाठी लागणारी वनविभागाची परवानगी मिळाली असून उत्तर दक्षिण तथा सावा वनविभागात काही झाडांची छाटणी चे काम प्रगतीपथावर आहे.
महावितरणचे सहकार्य करण्याचे आवाहन
जव्हार आणि मोखाडा उपकेंद्रास येणारी ३३ केव्ही वीजवाहिनी ही डहाणू – गंजाड – सूर्यनगर – जव्हार उपकेंद्र अशा मार्गाने येते. सदर वीजवाहिनी मोठ्या प्रमाणात डोंगराळ व जंगल क्षेत्रातून जात असून तिचे अंतर साधारणतः १०० ते १५० किलोमीटर इतके आहे.पावसाळ्याच्या काळात मुसळधार पाऊस, वादळी वारे, झाडांच्या फांद्या तुटणे तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास फॉल्ट शोधण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी काहीसा वेळ लागतो.
महावितरणचे कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तत्काळ कार्यवाही करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. नवीन १३२ केव्ही उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सद्यस्थितीत त्या अडचणी दूर झाल्या असून प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. सदर उपकेंद्र पुढील साधारण वर्षभरात कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून, ते सुरू झाल्यानंतर जव्हार तालुक्याच्या वीजपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात स्थैर्य व सुधारणा होईल असे आवाहन करण्यात आले आहे.