

वाडा (पालघर) : मच्छिंद्र आगिवले
वाडा कोलम हा केवळ वाडा तालुक्यातच नव्हे, तर जगात प्रचंड लोकप्रिय तांदूळ असून, जगभरातील मॉलमधेही बघायला मिळतो. वाडा कोलम ज्या भातापासून तयार होतो त्या झिनी व मसुरी जातीच्या वाणाचे उत्पादन सध्या संकटात असून, हा तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तांत्रिक दृष्ट्या कागदोपत्री जरी कोलमचे क्षेत्र फुगवून दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात या तांदळाचे घटलेले उत्पादन हे धक्कादायक वास्तव आहे. जमिनीचा खराब झालेला पोत, उत्पन्न कमी, निसर्गाचा लहरीपणा व संकरित बियाण्यांचा वाढता वापर या प्रमुख कारणांमुळे कोलम संकटात सापडला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असून, वाडा कोलम या जगप्रसिद्ध तांदूळाचे हे जन्मस्थान आहे. वाड्यात कागदोपत्री १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते ज्यात प्रामुख्याने गुजरात, कर्जत, झिनी, सुरती, तोरण्या, डांगी तर अनेक जातींचा समावेश आहे. वाडा तालुक्यातील झिनी व सुरती या भातापासून तयार होणारा तांदूळ ‘वाडा कोलम’ नावाने अत्यंत प्रसिद्ध असून, घुड्या व कोळपी या जाती त्यावेळी हळव्या व तितक्याच प्रसिद्ध होत्या.
वाडा कोलमच्या नावाने बनावट तांदळाची विक्री
प्रसिद्ध वाडा कोलमच्या नावे मात्र माॅल व दुकानांमध्ये सर्रास तांदळाची विक्री केली जाते जी पूर्णपणे बनावट असून, वैशिष्ट्यपूर्ण कोलम अशा नफेखोरीमुळे बदनाम होत आहे, असे शेतकरी सांगतात. वाडा कोलमला नोंदणीकृत करून तांत्रिक चौकटीत आणण्याचा प्रयत्न काही शेतकरी गटांनी केला आहे; मात्र तो अजूनही श्रेयवादाच्या कचाट्यात अडकलेला आहे. हल्ली बाजारात मिळणारा व पिकवला जाणारा संकरित वाडा कोलम मूळ तांदळाच्या तुलनेत उत्तम नसल्याचे काही शेतकरी सांगतात.
संशोधन आवश्यक
वाडा कोलम हा तांदूळ मोठ्या प्रमाणवर उत्पादित व्हावा, यासाठी जुनी पारंपरिक बियाणी, भाताला योग्य भाव व अधिक संशोधन करणे गरजेचे आहे; अन्यथा वाडा कोलम हा फक्त इतिहास बनून कागदावर शिल्लक राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वाडा कोलमची वैशिष्ट्ये
खाण्यास नरम, जिऱ्याप्रमाणे लहान, सडसडीत, पचनास हलका व अत्यंत चविष्ट अशा वैशिष्ट्यांनी भरलेला असल्याने आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
केवळ ५७.२० हेक्टर क्षेत्रावर उत्पन्न
निसर्गाच्या लहरीपणाने भातशेतीत येणारे नुकसान, जमिनीचा खालावलेला पोत, खतांचा अतिवापर, संकरित जातींच्या भातापेक्षा झिनी जातीचे येणारे अल्प उत्पन्न यामुळे झिनी व सुरती या भातांचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले आहे. वाडा तालुक्यात सध्या केवळ ५७.२० हेक्टर क्षेत्रावर बोटावर मोजण्याइतके निवडक शेतकरी उत्पादन घेत आहेत ही शोकांतिका आहे. झिनी भाताचे रोप उंच होते, जे नाजूक असल्याने शेतात कोसळून मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागते आणि याच प्रमुख कारणाने शेतकरी झिनीपासून दुरावला आहे.