

मनवेलपाडा : वसई-विरार शहरातील प्रवाशांसाठी आता एक मोठा दिलासादायक बदल घडणार आहे. वसई-विरार महानगरपालिका परिवहन विभाग लवकरच 100 नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस (ए-ईीी) सेवा सुरू करणार असून त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
दररोज हजारो नागरिक वसई, विरार आणि आसपासच्या भागात प्रवास करतात. मात्र, बससेवेच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक प्रवाशांना ‘वेटिंग’वरच प्रवास करावा लागतो. वाहतुकीच्या या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने 100 ई-बसेस शहरात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, कमी आवाज, शून्य प्रदूषण आणि जास्त आरामदायी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांच्या प्रवासात नवा बदल घडवणार आहेत.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या बसेस शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वसई, विरार, नालासोपारा, तसेच भायंदरपर्यंत धावणार आहेत. यामुळे दररोज हजारो प्रवाशांना वेटिंगपासून मुक्ती मिळेल. शिवाय, ई-बसेसचा वापर केल्याने इंधनाची बचत होईल आणि शहरातील वायू प्रदूषणातही घट येईल.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका प्रशासनाने पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू केले आहे. चार्जिंग स्टेशनपासून ते बस डेपोपर्यंत सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत असून, “आता खऱ्या अर्थाने वसई-विरारचा प्रवास बदलणार,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळणार आहे. स्वच्छ ऊर्जा वापरून चालणाऱ्या या बसेसमुळे शहराचे प्रदूषण नियंत्रणात येईल आणि वसई-विरारचा विकास अधिक हरित आणि टिकाऊ दिशेने होईल. एकंदरीत, महानगरपालिकेने घेतलेला हा पुढाकार हा वसई-विरारच्या प्रगतीकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट शहराच्या दिशेने.