खानिवडे : वसई पूर्वेतील चांदीप या अभयारण्याच्या सीमेवरील गावात मंगळवारी रात्री बिबट्याचा वावर असल्याची पोस्ट समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या भागातील तसेच या भागात नागरिकांसह स्थानिक रहिवाशांत घबराट पसरली आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र ज्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे प्रसारीत झाले होते त्या परिसरात कोणत्याही प्रकारची निशाणी किंवा बिबट्याचे ठसे आढळून आले नाही. यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जर तसे काही आढळले तर लागलीच वन परिक्षेत्र मांडवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. ही बाब छोटी नसल्याने वन कर्मचारी सतर्कता ठेऊन शोध घेत असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी संदीप चौरे यांनी सांगितले आहे. वसईत आता बिबट्या दिसणे हे काही नवीन नाही सुमारे पाच वर्षांपूर्वी मांडवी हद्दीत दिसून आलेला बिबट्या दुसऱ्या दिवशी मांडवी भामटपाडा दरम्यानच्या पाय वाटेवर एका विहिरीच्या कडेला मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी कशीद कोपर च्या गावात रात्री संचार करून श्वानांचा, प्राण्यांचा फडशा पाडणारा बिबट्या चा शेजारील जंगलात डिजिटल शोध घेऊन वनविभागाने लावलेल्या यशस्वी सापळ्यात अडकवला होता. जो पुढच्या पायाला जखम झालेल्या अवस्थेत सापडला होता. ज्याच्यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात यशस्वी शखक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आले आहे.
जो आजही तीन पायांवर आपले जीवन उद्यानात व्यथीत करत आहे. तर मागच्यावर्षी खार्डीच्या तळ्याचा पाडा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांनतर त्या परिसरात श्वान व गायीच्या वासराचा फडशा पाडलेल्या अवस्थेत अवयव सापडले होते. तसेच मागील वर्षभरापूर्वी भात कापणीच्या वेळी नवसई भाताने या परिसरातील शेतांमध्ये बिबट्या दिसल्याचे प्रसारित झाले होते. मात्र भाताणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अनेक दिवसांच्या शोध मोहिमेत तसे काही दिसून आले नव्हते. तर काही महिन्यांपूर्वी वसई शहरात असलेल्या वसई किल्ल्यात ही बिबट्याची घुसखोरी दिसून आली होती ज्याला वनविभागाने जेरबंद केले होते. त्यानंतर आता चांदीप येथे बिबट्या आल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत आहे. मात्र प्रसारित फोटो हे नक्की चांदीप परिसरातील आहेत का? त्याला कोणीही दुजोरा देत नाहीत त्यामुळे हा सवाल पुढे येत आहे.
तर अभयारण्य परिसरात मागील काही वर्षात सप्टेंबर आक्टोबर महिन्यात भात कापणीच्या हंगामात बिबट्या दिसून येत असल्याचे वरील घटनांवरून निदर्शनास येत आहे.
बिबटे किंवा इतर श्वापदे आपला अधिवास सोडून नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. कारण अभयारण्यात नको तेव्हढा मानवी हस्तक्षेप, बेसुमार जंगलतोड आणि दखल घेण्याजोगे बेफाम अतिक्रमण ही कारणे असून आता सर्वात मोठा राक्षस हा अतिक्रमाणातून आणखी वाढत आहे जो प्राण्यांच्या अधिवासाच्या मुळावर आला आहे.