

खानिवडे : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या किल्ल्यांची पडझड सुरू असून, जंजिरे वसई किल्ल्याच्या बंदर दरवाजा तटबंदीचा काही भाग कोसळल्याने दुर्गसंवर्धक आणि इतिहासप्रेमींनी पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर खंत व्यक्त केली आहे.
गेल्या किमान १०० वर्षांत केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याच्या बंदर दरवाजा तटबंदीची एक टक्काही डागडुजी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही तटबंदी अक्षरशः अंतिम अवस्थेत पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या महिनाभरात बंदर दर्या दरवाजा तटबंदीचा काही भाग कोसळला असून, उर्वरित भाग जेमतेम तोल सांभाळून उभा आहे. लवकरच हा भाग कोसळून मुख्य दरवाज्यात चिरेबंदी दगडांचा खच पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
किल्ले वसई मोहीम प्रतिनिधींनी वेळोवेळी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला प्रत्यक्ष भेटून, तसेच लेखी निवेदने आणि शेकडो ईमेलद्वारे तटबंदी दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, मुंबईकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
ऐतिहासिक कागदपत्रांत नमूद असलेला बंदर दरवाजा आणि त्यालगतची तटबंदी जतन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी श्रमदान मोहीमा राबवल्या आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या भागाची तातडीने डागडुजी करणे अत्यावश्यक आहे. तसेच परिसरातील अनावश्यक झाडी, मोठे वृक्ष व फांद्या हटवून स्वच्छता करणे गरजेचे आहे.
श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक, किल्ले वसई मोहीम परिवार
दर्या दरवाज्याजवळील महाकाय वृक्षामुळे तटबंदीचा मोठा भाग कमकुवत झाला असून, येत्या पावसाळ्यात तटबंदी व चर्या यांचा मोठा भाग कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि पुरातत्त्व विभागाची कार्यपद्धती लक्षात घेता, कोसळलेले बांधकाम पूर्ववत उभारले जाईल की नाही, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. दर्या तटबंदीजवळील कस्टमची मोडकळीस आलेली इमारत तसेच होड्यांचे अवशेष किल्ल्यासाठी धोकादायक ठरत आहेत.