

जव्हार हे समुद्र सपाटीपासुन सर्वात उंच ठिकाण असलेलं थंड हवेचे ठिकाण वजव्हार तालुक्यातील पाऊसाळ्यात दाभोसा, काळमांडवी, दादरकोपरा, धबधब्यांनी सौंदर्य पावसाळ्यात अतिशय मनमोहक अशी जव्हार तालुक्याची ओळख आहे. तर यापलीकडे सोसाट्याचा वारा, दाट धुके पडत गेल्या काही दिवसांपासून पावसाला चांगली सुरुवात झाल्याने येथील वातावरणात प्रचंड गारवा जाणवू लागला आहे, त्यामुळे पावसाळी सहलीचे बेत होऊन जव्हार ग्रामीण भागाला पर्यटकांची पसंती मिळत असल्याने येथील पर्यटन बहरले आहे.
पावसाळ्यातील जव्हारचे पर्यटन म्हणजे येथील वातावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्नाट रानवारा, निसर्गानं हिरवा शालू पांघरलेला सुंदर नजराना, खळाळणारे झरे, पाऊस आल्यानंतर धो-धो वाहणारे धबधबे... अन् बरंच काही.. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी म्हणजे जव्हार होय. या तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत या सृष्टीच्या अकल्पित आनंदाचा मोह आवरता न आल्याने येथे पर्यटकांची आता गर्दी होईल, तथापि, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या करीता स्थानिक प्रशासनाने धबधबे ठिकाणी काही अटी शर्ती घालत 30 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. तरीही शनिवार रविवारी पर्यटकांची अलोट गर्दी असते.
जव्हार तालुक्यात धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते. पावसात भिजल्यानंतर गरम गरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने, पर्यटकांना आपला आनंद लुटण्यासाठी एक वेगळा वाव या तालुक्यात तयार होऊ लागला आहे. शिवाय जव्हार शहरात निरनिराळ्या प्रकारचे हॉटेल्स, कुटीर आणि वर्षा सहलीचे नियोजन होऊ लागल्याने पर्यटकांना ही एक पर्यटन पर्वणी असून ही मौज मजा काही औरच असते.
हिरडपाडा धबधबा...
जव्हार शहरापासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर असणार्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नव्हता मात्र, आता समाज माध्यमांच्या वापराने हे पर्यटन स्थळ निदर्शनास येत आहे. पूर्वी, धबधब्या पर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नव्हती. मात्र, यंदा थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो, हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो, वर्षा सहली करिता हे एक उत्तम ठिकाण आहे.
काळमांडवी धबधबा....
जव्हार शहरापासून 5 कि.मी अंतरावर असणार्या केळीचा पाडा या गावातून 3 किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते, काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव काळमांडवी असे पडले आहे. अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसतात, पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात, पावसाळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो. व गावातच वाहने पार्क करून त्या पर्यटन ठिकाणी पोहचावे लागत आहे.
दाभोसा धबधबा...
जव्हार तालुक्यापासून 17 कि.मी. अंतरावर असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाभोसा धबधबा. या धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाली असून अनेक पर्यटक नैसर्गिक धबधब्यावर ठाणे, गुजरात, नाशिक, सेलवास, वाडा, विक्रमगड, या ठिकाणाहून डोंगरदरीतील नैसर्गिक धबधबा पाहायला मिळत आहे. त्याचा आनंद घेतांना सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार मोठी गर्दी होतांना दिसत आहे.
खडखड धरण....
जव्हार शहरापासून साधारण 6 कि.मी. अंतरावर खडखड धरण आहे. मुसळधार पावसामुळे हे धरण दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो. सांडग्यावरून कोसळणार्या पांढराशुभ्र पाण्याने ओलचिंब भिजत पावसाचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक हा स्वतःच्या दुनियेत रममाण होतो.
जयसागर जलाशय...
साधारण गेल्या साठ वर्षांपूर्वी जव्हार शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा याकरिता जव्हार संस्थानातील नरेश यशवंतराव मुकणे महाराज यांनी जय सागर जलाशयाची निर्मिती केली. पावसाळ्यात हा परिसर अतिशय नयनरम्य असून या ठिकाणी येऊन फोटोग्राफी करण्याकरिता पर्यटक प्रथम पसंती देत आहेत.