

खानिवडे: वसई तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून अधून मधून सरी कोसळत आहेत.पावसाने घेतलेल्या या उसंतीमुळे महामार्गावर मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. ते भर रस्त्यात आपला ठाण मांडून विश्राम करताना दिसत आहेत.त्यांचा भर रस्त्यातील विश्राम हा त्यांच्या स्वतःच्या जीवाला व येथून प्रवास करणाऱ्या चालकांना धोकादायक आहे. यामुळे अपघाताचा धोका संभवतो आहे.
सद्ध्या पावसाळा सुरू आहे , रान माळांवर , जंगलात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. मात्र असे असले तरी मोकाट गुरे वरील ठिकाणी चारा चरून महामार्गावरील रस्त्यावर येऊन रवंथ करत बसलेली दिसून येत आहेत.
याला कारण चरावांच्या ठिकाणी असलेल्या विश्रामाच्या जागा ओल्या किंवा चिखलमय झाल्या आहेत. तश्या जागांमध्ये माश्या मच्छर किडे यांचा त्रास जनावरांना होतो. यामुळे जनावरे सुक्या जागांकडे वळत आहेत.
अश्या जागा पक्क्या रस्त्यावर दिसत असल्याने मोकाट जनावरे महामार्गावरील उड्डाण पुलांखाली आणि उड्डाण पुलांच्या सुरवातीला उड्डाण पुलावर व पुलाखाली जाणाऱ्या दोन रस्त्यांच्या फाट्यांवर बिनधास्त बसलेली दिसून येत आहेत.
यात महत्वाचे म्हणजे पाऊस पडून गेला की लागलीच सुका होणारा रस्ता आणि वाहनांच्या वर्दळीत होणाऱ्या इंजिनाच्या धुरामुळे माश्या मच्छर व किडे कीटक ह्यांचा त्रास होत नाही. म्हणून ही गुरे भर रस्त्यात ठाण मांडत असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र त्यांचा बंदोबस्त करून त्यांना आणि चालकांना संभावित धोक्यापासून संबंधित रस्ते प्रशासनाने वाचवावे अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.
अपघातांची शक्यता
महामार्गावर ये- जा करणार्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना रोखणे अशक्य असले तरी यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू असल्याने जनावरे जंगलातून येताना महामार्गावर येवून ठाण मांडतात. त्यांच्या या वावरामुळे जनावरे व वाहनचालकांच्या जिवीताला धोका निर्माण होत असून यावर उपाययोजनांची गरज आहे.