

पिंपरी: मावळ परिसरात पावसाने पुन्हा जोर धरल्याने पवना नदीतील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरण सोमवारी (दि. 18) सायंकाळपर्यंत 98 टक्के भरले असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. खबरदारी म्हणून दुपारी दोनपासून धरणाच्या जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्र फुगले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान पवना धरणाच्या पाण्यावरुन भागविली जाते. महापालिका पवना नदीच्या रावेत बंधार्यातून दररोज 520 एमएलडी पाणी उचलते. ते निगडी येथील केंद्रात शुद्ध करून संपूर्ण शहराला पुरविले जाते. (Latest Pimpri News)
पवना धरणाने गेल्या आठवड्यात शंभरीकडे वाटचाल केली होती. मात्र, पावसाने विश्रांती दिली. पावसाने रविवारपासून (दि.17) दमदार हजेरी लावली आहे. त्या भागातील डोंगरातून पाणी वाहत आहे. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणात जलसाठा वाढत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा येवा प्राप्त होत आहे.
पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत 1921 मि.मी पावसाची नोंद
सोमवारी सायंकाळी पाच वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 98 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या तारखेला धरणात जवळपास सारखाच पाणीसाठा होता. या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला होता. तर, संपूर्ण जून आणि जुलै महिन्यातही जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे पवना धऱण लवकर भरले आहे.
गतवर्षी उशिरा पाऊस सुरू झाला असला तरी जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे आजच्या तारखेला धरणात जवळपास समान पाणीसाठा असलेला दिसतो. चालू वर्षी धरण पाणलोटक्षेत्रात आजपर्यंत 1921 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नदीपात्रातील शेतीची अवजारे काढण्याचे आवाहन
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येव्यानुसार पवना धरणातून विसर्ग पवना नदीपात्रात करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच, नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेतीची अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
धरणातून पाण्याचा विसर्ग
पाणीसाठा वाढल्याने धरण दुपारी एकला 97.45 टक्के भरले होते. खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या जलविद्युत केंद्राद्वारे दुपारी दोनपासून 800 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळी पाचला धरणातील पाणीसाठा 98.02 टक्क्यांवर पोहचला होता.
दिवसभरात 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 1921 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातून 1400 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी, पवना नदीतील पाण्याची पातळी वाढून पात्र फुगले आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे, असे पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
भामा आसखेड धरण 91.76 टक्के
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी आणले जाणार आहे. ते काम वेगात सुरू आहे. ते धरण सोमवारी (दि.18) सायंकाळपर्यंत 91.76 टक्के भरले. दिवसभरात 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून महापालिकेकडून दररोज 100 एमएलडीपैकी 80 एमएलडी पाणी घेतले जात आहे. ते धरण पूर्वीच 100 टक्के भरले आहे. तर, मुळशी धरणात 89.87 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात दिवसभरात 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाविकास आघाडीसह खासदारांकडून जलपूजन
पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरणात जलाशय पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांकडून पवना धरणावर जाऊन जलपूजन करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, महापालिका बरखास्त झाल्याने गेल्या सव्वातीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू असल्याने जलपूजनांची परंपरा खंडित झाली आहे.
ती बाब लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्यांकडून 5 ऑगस्टला जलपूजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणी मिळावे, असे साकडे पवनामाईस घालण्यात आले. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केले.