

पालघर : बाबासाहेब गुंजाळ
पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडून शौर्य पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गृह मंत्रालय भारत सरकार यांनी शौर्य पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात राज्यातील पोलीस दलाच्या एकमेव पोलीस अधीक्षक यतीश देशमुख त्यांचे सहकारी इतर १९ सदस्यांचा समावेश आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक कर्मचारी यांना शौर्यपदक देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. महाराष्ट्रातून त्यांच्या या यशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालघर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व त्यांच्या १९ जणांच्या टीमने गडचिरोलीमध्ये असताना भामरागड तालुक्यातील कत्रनगट्टा या जंगल परिसरात १३ मे २०२४ रोजी दुपारी दोन वाजता गस्त घालत असताना अचानक वीस ते पंचवीस नक्षलवाद्यांनी या पोलिसांच्या तुकडी वरती अचानक हल्ला केला.
त्या टीमने धैर्याने या हल्ल्याचा प्रतिकार करत केलेल्या गोळीबारात तीन नक्षली ठार झाले. यात वासू उर्फ समर कोरचा हा नामचीन नक्षली ठार झाला होता. या तीन नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. या प्रकरणी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख व त्यांच्या १९ लोकांच्या टीमला केंद्रीय गृहमंत्रालयाने शौर्यपदक प्रदान केले आहे.
पुरस्कार प्राप्त टीम मध्ये २ पोलीस उप निरीक्षक राजू गवळी व वासुदेव मढवी, हेड कॉन्स्टेबल विजय खोपडे, ३ नाईक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप आत्राम, मासा आत्राम, दशरथ मढवी, तर १३ पोलीस कॉन्स्टेबल अजय मढवी, गणेश दुबळा, विजय मढवी, भूपेश जुमनाके, दालसु बोगामी, राजेश गिरंगे, राकेश बेडकी, सुधाकर पोर्टे, श्रीनिवास निष्टुरी, गणेश गंजीवर, नितेश टेंबेकर, शिवाजी हिचामी, संजय कांकाबंदावर यांचा समावेश आहे.
नक्षलविरोधी लढा : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या नक्षलवादाविरोधातील लढ्याला आता मोठे यश मिळाले आहे.
मुकमकांमध्ये सहभाग व शरणागती : गडचिरोली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून यतीश देशमुख यांनी अनेक चकमकींमध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्यांच्या प्रयत्नाने गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याचाच परिणाम पुढे अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले व शरणागती पत्करली होती.
यशाची पोचपावती : "गडचिरोलीत केलेल्या कामाचा हा गौरव तेथील सर्व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचे हे चीज झाले आहे," असे यतीश देशमुख यांनी म्हटले आहे.