खानिवडे : पालघर जिल्ह्याला लाभलेले मनमोहक सागरी किनारे आता थोकादायक स्थितीत आले आहेत. दरसाल किनाऱ्यांची मोठी धूप होत आहे. यामध्ये पावसाळ्यात अगोदरच खवळलेला समुद्र आपल्या रौद्र लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यांची धूप रोखून धरणाऱ्या वृक्षांच्या मुळावर घाव घालून त्यांना उघडे पाडत आहे. त्यात जर या दिवसात वादळी वाऱ्यासह मोठे उधाण आले तर मुळे उघडे पडलेले वृक्ष उन्मळून पाडून सागर अतिक्रमण करून आपले साम्राज्य वाढवत असल्याचे दिसून येत आहे.
गुजरात सीमेवरील डहाणूचा किनारा ते वसईच्या पाचूबंदर अश्या जवळपास ७० ते ८० किलोमीटर सागरी किनाऱ्यावरील सखल भाग समुद्र दरसाल गिळंकृत करत आहे. हे प्रमाण मागील वीस वर्षांपासून दरसाल पावसाळ्यात कमी अधिक होत आहे. यासाठी अशा भागात धूपप्रतिबंधक उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
आता सुरू असलेल्या पावसात वसईतील भुईगाव अर्नाळा, नवापूर समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारे न बांधल्यामुळे मोठ्या प्रमाणात किनाऱ्याचं नुकसान झालं आहे. या नुकसानीत नागरिकांची घरे, सुरूची वने, शेतजमिनी यांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
या समस्येवर अर्नाळा येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मेोहेर यांनी मे २०२४ साली एम आर डी ए पाठपुरावा केला होता. एम आर डी ए मुंबई मुख्य अभियंता यांना येथील आवश्यक ठिकाणी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. तरीही त्याची पूर्तता न झाल्यामुळे तसेच पतन अभियंता यांच्याकडून मंजूर केलेले विकासकाम काढून घेतल्यामुळे येथील विविध भागातील बंधारे रखडलेले आहेत.
पतन विभागाकडून अर्नाळा व इतर भागात सर्वेक्षण, मोजणी इत्यादी आवश्यक प्रक्रिया झाल्या होत्या, त्यानुसार ७०० मीटरचा धूप प्रतिबंधक बंधारा मंजूरही करण्यात आला होता परंतु शासकीय अनास्था समन्वयाचा अभाव याचा एकत्रित फटका या भागाला बसलेला आहे. यामुळे नवापूर व भुईगाव या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली आहे. उधाणलेला समुद्र नागरी वस्ती पर्यंत पोहोचण्या पूर्वी याची उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.
पावसाळा सुरू झाला की विविध राजकीय पक्ष, पर्यावरण संस्था, पालिका प्रशासन वसईत वृक्ष रोपणाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र किनाऱ्यावर असलेली सुरुची झाडे यांचे संगोपन करण्यासाठी शासकीय स्तरावर कुठलेच प्रयत्न होत नाहीत. नसल्यामुळे वसईचे विशाल, नयनरम्य समुद्रकिनारे लवकरच बकाल होण्याच्या वाटेवर आहेत.
मागील वीस वर्षात एकूणच पालघर जिल्ह्यात समुद्राचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्याचा फटका विविध समुद्र किनाऱ्यांना बसलेला आहे. किनाऱ्यालगतची शेकडो एकर जमीन समुद्राने गिळंकृत केलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन, नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्त्रोत, जुनी झाडे नष्ट झालेली आहेत. आगामी काळात समुद्राचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याकरिता तातडीने आवश्यक भागामध्ये धूप प्रतिबंधक किनाऱ्यांची तजवीज करणे गरजेचे आहे.
तात्कालीन पतन अभियंता राजू बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची सगळी तजवीज व सर्वेक्षण झाले होते. एम. एस. आर. डी. सी. कडे ही विकास कामे हस्तांतरित झाल्यामुळे या भागातील धूप प्रतिबंधक किनारे रखडले असल्याची माहिती दिली आहे.