

डहाणू : डहाणू तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या हॉटेल्समधून उघड्यावर सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 30 जानेवारी रोजी दैनिक पुढारी वृत्तपत्रात मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगतच्या हॉटेलांचे सांडपाणी थेट शेतजमिनीत या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आंबोली ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेतली. संबंधित हॉटेल मालकांना नोटिसा बजावून ग्रामसभेत बोलावण्यात आले.
ग्रामसभेत हॉटेल व्यावसायिकांना सांडपाणी उघड्यावर न सोडता शोषखड्डे तयार करून त्यात सांडपाणी सोडावे व त्यावर प्रक्रिया करून योग्य विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमून आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.
यानंतर महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीच्या सूचनांचे पालन करत शोषखड्डे तयार केले असून, सांडपाणी आता त्यात सोडले जात आहे. पुढील टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेची माहिती ग्रामपंचायत अधिकारी मनोज प्रजापत यांनी हॉटेल मालकांना दिली आहे.
हे तंत्रज्ञान वापरल्यास भविष्यात सांडपाणी भातशेती, नदी किंवा रस्त्यालगतच्या गटारांमध्ये जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आंबोली परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.