Tarapur MIDC Industries | तारापूर एमआयडीसीतील उद्योगसंख्या दिवसेंदिवस घटतेय

तारापूर एमआयडीसीसमोर गंभीर प्रश्न, ६४ वर्षांचा टप्पा पार, विकासाचा उत्सव की समस्यांचा डोंगर ?
Tarapur MIDC Industries
Tarapur MIDC Industries
Published on
Updated on

बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चा ६४ वा वर्धापन दिन १ ऑगस्ट रोजी राज्यभर साजरा होत असताना, राज्यातील पहिल्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या तारापूर एमआयडीसीच्या आजच्या वास्तवाकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या औद्योगिक क्षेत्रासमोर आज समस्यांचे मोठे डोंगर उभे राहिले असून, त्याचा सर्वाधिक फटका उद्योगांसह परिसरातील नागरिकांना बसत आहे.

सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये एकेकाळी सुमारे दोन हजारांच्या आसपास छोटेमोठे उद्योग कार्यरत होते. मात्र विविध कारणांमुळे अनेक उद्योग बंद पडले किंवा स्थलांतरित झाले आणि सध्या येथे केवळ १,१३६ उद्योग कार्यरत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्राची घसरती वाटचाल चिंतेचा विषय बनली आहे. औद्योगिक विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमआयडीसीची स्थापना झाली होती. मात्र आज या परिसरात प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, सांडपाण्याची समस्या, रासायनिक दुर्गंधी, धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट, अपुरी पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. अनेक वेळा रासायनिक गळती, स्फोट, आग आणि अपघातांच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tarapur MIDC Industries
Uttan Virar Sea Bridge | दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार उत्तन-विरार सागरी सेतू

तारापूर एमआयडीसी परिसरातील नागरिक वर्षानुवर्षे प्रदूषित हवा, दूषित पाणी आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जात आहेत. औद्योगिक विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची भावना स्थानिकांमध्ये वाढत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाही ठोस उपाययोजना अद्याप दिसून आलेल्या नाहीत. परिणामी उद्योग, कामगार आणि स्थानिक नागरिक या तिन्ही घटकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Tarapur MIDC Industries
दहिसर-विरारदरम्यान रुळांच्या उंचीत वाढ नको

एमआयडीसीचा वर्धापन दिन साजरा होत असताना केवळ औद्योगिक प्रगतीचा गौरव करण्यापेक्षा गेल्या सहा दशकांत निर्माण झालेल्या समस्यांचेही आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. तारापूर एमआयडीसीला पुन्हा एकदा उद्योगांसाठी आकर्षक, सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी शासन, एमआयडीसी प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उद्योग व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे प्रभावी पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि उद्योजकांकडून होत आहे.

ठोस उपाययोजनांची गरज

आज ६४ वर्षांनंतर तारापूर एमआयडीसीसमोर उभे असलेले प्रश्न केवळ औद्योगिक विकासाचे नसून, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित आहेत. त्यामुळे आगामी काळात केवळ वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा या समस्यांवर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करणे हीच खरी एमआयडीसीसाठी सर्वात मोठी जबाबदारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news