

वसई : वसई, नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. यात वसईतून ७ व नालासोपाऱ्यातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरलेल्या ८ उमेदवारांनी माघार घेतली. विशेषतः बंडखोरी केलेले शिवसेनेचे विनायक निकम यांनी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील फूट टळली आहे. विविध उमेदवार रिंगणात असले तरी वसईतील खरा सामना बविआ, महायुती आणि महाविकास आघाडी असा तिरंगी होणार असून, नालासोपाऱ्यात बवीआ आणि महायुती अशी दुहेरी झुंज पाहायला मिळणार आहे.
वसईतून १५ उमेवारांनी २७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेवारांचे ७ अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरविले होते. तर सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ उमेवारांनी ६ मागे घेतले त्यामुळे सात उमेदवार वसईतून रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडी विजय पाटील, बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर, महायुती स्नेहा दुबे तर अपक्ष म्हणून रुग्णमित्र राजेंद्र ढगे, प्रल्हाद राणा, गॉडफ्री अलमेडा व विनोद तांबे हे निवडणूक लढविणार आहेत.
नालासोपारा मतदारसंघातून १६ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केलेारा होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला तर ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे १२ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात बहुजन विकास आघाडी क्षितीज ठाकूर, महायुती राजन नाईक, महाविकास आघाडी संदीप पांडे, प्रहार जनशक्ती धनंजय गावडे, मनसे विनोद मोरे, वंचित आघाडी सूचित गायकवाड, बहुजन समाज पार्टी सुरेश मोने, अपक्ष मधून बलराम ठाकूर, हरेश भगत, किर्तीराज लोखंडे, विनोद पाटील, नरसिंग आदावले हे निवडणूक लढविणार आहेत. वसई व नालासोप- मतदारसंघातून आठ उमेदवारांनी माघार घेतली. वसईतून शिवसेनेचे विनायक निकम, बविआच्या सौ. प्रविणा ठाकूर, प्रहार जनशक्तीच्या भावना पोकळे व अपक्ष राजकुमार दुबे यांनी तर नालासोपाऱ्यात सौ. प्रविणा ठाकूर, कवाळे, गायकवाड आणि घाटाळ यांनी अर्ज मागे घेतला.