

वाडा : खुपरी गावातील औद्योगिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका कंपनीच्या उग्र वासामुळे आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार बेजार झाले आहेत. गुरुवारी यातील तीन कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अनेकदा तक्रारी करूनही कंपनी विरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबधीत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
वाड्यातील खुपरीत एका कंपनीने खुपरी गावातील औद्योगिक क्षेत्रात मोठे थैमान घातल्याचा आरोप केला जात आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे या कंपनीतून निघणारा उग्र वास आजूबाजूला काम करणाऱ्या कामगारांना बेजार करीत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे केल्याचे कामगारांनी सांगितले. गुरुवारी या भागातील तीन कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, यात एका महिलेचा समावेश आहे.
वाडा तालुक्यात अनेक दिवसांपासून लोखंड उत्पादित करणाऱ्या व टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचा उच्छाद सुरू असून अनेक तक्रारी करूनही यात कुठलाही बदल होताना दिसत नाही. वाडा हा खरेतर निसर्गसंपन्न तालुका असून उभ्या औद्योगिकीकरणामुळे लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. बेशिस्त कारखान्यांमुळे मात्र तालुक्यातील लोकांचे आरोग्य संकटात सापडले असून खुपरी येथील घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून कंपनीविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.